छत्रपती संभाजीनगर,दि.१८(जिमाका)- जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्था व शांतता अबाधित आहे. प्रशासन सज्ज असून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता कायम राखावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद येथे केले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद येथील औरंगजेब कबर सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करुन आढावा घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, तहसिलदार स्वरुप कंकाळ,पुरातत्व विभागाचे राजेश वाकेकर तसेच सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आदी उपस्थित होते.
खुलताबाद तहसिल कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक राठोड यांनी सांगितले की, खुलताबाद येथे पुरेसा बंदोबस्त असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ३० पोलीस, राज्य राखीव बल गटाची ५० जवानांची एक तुकडी, ८० होमगार्ड यांचा त्यात समावेश आहे. सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तिची नोंद घेतली जात आहे. हा बंदोबस्त २४ तास असून संपूर्ण खुलताबाद परिसरात ड्रोन पेट्रोलिंगही केले जात आहे. पोलिसांच्या ड्रोन व्यक्तिरिक्त अन्य ड्रोनच्या उड्डाणांना बंदी आहे. याशिवाय पोलीस सोशल मिडियाबाबत अत्यंत दक्ष असून चुकीची माहिती अथवा भावना भडकवणाऱ्या मजकूरावर सायबर सेल मार्फत लक्ष आहे. अशा वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले. याशिवाय प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी त्यांच्यामार्फत ग्रामसुरक्षा ॲपवर माहिती द्यावी. १८००२७०३६०० असा ग्राम सुरक्षा ॲपचा क्रमांक आहे. शिवाय नागरिक ११२ या क्रमांकावरही आपल्याकडील माहिती देऊ शकतात. आपल्या परिसरात शांतता राखणे हे आपले कर्तव्य असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, गावातील संशयास्पद व्यक्तिंच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. त्याबाबत तात्काळ पोलिसांना सांगावे सतर्क व सजग रहावे.गाव पातळीवर माहिती देऊन ग्रामस्थांनाही माहिती देण्यास सांगावे. सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परस्परांशी संपर्क साधावा,असेही त्यांनी सांगितले. अफवांवर विश्वास ठेवु नये. सोशल मिडियावरही लक्ष ठेवावे. आक्षेपार्ह मेसेज पाठविले जात असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामपातळीवरील यंत्रणेला दिले.
०००००